ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यात केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा
मुंबई – राज्यात अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पाच सदस्यीय पथक आज मुंबईत येणार आहे. त्यानंतर या पथकांची तीन वेगवेगळ्या पथकांमध्ये विभागणी केली जाईल. हे पथक पुढील तीन दिवस म्हणजे 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल.
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक डोळ्यादेखत खराब झालं. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी संघटना आणि अनेक राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाहणी पथक राज्यातील ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी नियुक्त केलं आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये डॉ. के. मनोहरन, डॉ. आर. पी. सिंग, दीनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखालील पथक हे औरंगाबाद महसूल विभागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तर डॉ. आर. पी. सिंग यांचे पथक अमरावती आणि नागपूर, दीनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिक विभागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.