ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले
बारामती : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची…’ असं फलकावर लिहिलं आहे.
गेला महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचा मोठा हात असल्यामुळे बारामतीकरांना हुरुप आला आहे.
‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची… महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल, तोच होणार, कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्रं इथूनच हलतात… साहेब…’ असे फलक उभारुन देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला होता. महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन भाजपविरोधी वातावरण निर्मिती केली गेली. मात्र आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याच वेळी मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत बिनसले आणि युती तुटली. पवारांनी शिवसेनेशी जुळतं घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अंमलात आला.