एमपीएससीच्या 833 अभियंत्यांवर बेकारीची कुऱ्हाड ; राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/raj-thackera.jpg)
मुंबई- परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या 833 अभियंत्यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, असे आश्वासन यावेळी त्यांनी उमेदवारांना दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर देखील राज्यातील 833 पदवीधर अभियंत्यांवर नोकरी जाण्याची वेळ आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे अभियंते अडचणीत आले आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.
राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे 833 उमेदवारांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या सर्व अडचणीतून मार्ग निघावा व न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या उमेदवारांचे सर्व म्हणणे राज ठाकरेंनी ऐकून या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन राज ठाकरे यांनी या उमेदवारांना दिले.