एकादशीवर करोनाचे सावट, संत तुकोबा आणि माऊलींचे मंदिर राहणार बंद
- देवस्थान मंदिर समितीचा निर्णय
- इतिहासात पहिल्यांदाच बंदचा योग
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
करोनाने देशभरात थैमान घातले असताना राज्य सरकारने ब-याच गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. त्याला सामाजिक स्तरातूनही पाठिंबा मिळत आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत 23 मार्चपर्यंत देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर 23 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. तर, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे 20 मार्च रोजी एकादशीनिमित्त देहू व आळंदीत दर्शनासाठी येणा-या भाविकांनी याठिकाणी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवली जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक प्रमुख मंदिरांनी नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. शिर्डीचे साईबाबा मंदिर, शनि शिंगणापूरचे शनि मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे मंदिर, मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजान महाराज मंदिर, अंबेजोगाई येथील अंबाबाई मंदिर ही मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आता देहू आणि आळंदी येथील मंदिरांचीही समावेश झाला आहे.
अन्नछत्र, भक्तनिवास राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण असल्याने प्रशासन आणि स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आळंदी विश्वस्तांनी १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच माऊलीचे मंदिर बंद ठेवण्यात आलं असल्याचे विश्वस्तांनी महाईन्यूजशी बोलताना सांगितलं आहे. २० मार्च रोजी एकादशी असून महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आळंदीत न येण्याची विनंती करण्यात आली आहे. ३१ मार्चच्या आधी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी माहिती दिली आहे. या दिवसांमध्ये नियमित असलेली पूजा दररोज पार पडेल. अन्नछत्र, भक्त निवास हे दरम्यान बंद राहणार आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.