ऊस उत्पादकांना हमी भाव देण्यासंदर्भात ३ जूनला मुंबईत बैठक
नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी पुढच्या महिन्यात ३ जून रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकरी हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) प्रमाणे मिळावा, यासाठी पुढील बैठक ३ जूनला मुंबईत होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतक-यांना रास्त व किफायतशीर दर मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या १९८२ च्या कायद्यात निश्चित केलेले आहे. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव मिळावा यासाठी वस्तू व सेवा कर अंतर्गत नेमलेली अर्थमंत्र्यांची समिती प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासंदर्भात झालेल्या बैठकीत एकमत झाले असून याबाबतचा तोडगा काढण्यासाठी आणखी चर्चा होणे गरजेचे आहे. यासाठी विविध विभागाकडून काही आकडेवारी तसेच माहिती मागितली आहे. वस्तू व सेवाकर परिषदेला यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याबाबत विधी विभागाकडून सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.