‘उधार राजाचे जाहीर आभार’, फडणवीसांचा ठाकरेंना टोला
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एका वर्षाहून अधिक कालावधी झाला. या कालावधीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरात दाखल होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.
वाचा :-९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला
गोसेखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यासाठीच आज मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले होते. त्यांच्या या दौऱ्याबाबत फडणवीसांनी ट्विट केलं. “मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!”, असा टोला त्यांनी लगावला.
वाचा :-VIDEO: …म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी अचानक थांबवला ताफा
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूरला पहाणी दौऱ्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रूपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले होते. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले होते की मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसान भरपाई म्हणून देणं योग्य नाही. अशा प्रकारची मदत देणं म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे. त्याच उक्तीचा आधार घेत त्यांनी आज ठाकरेंना टोला लगावला.