उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपला “साडेसाती”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/409395_278526852202956_1750266685_n.jpg)
- आवेशपूर्ण भाषणात मातंग समाजाचा अपमान
- लहुजी शक्ती युवा सेनेचा संताप
- भालेराव यांच्या राजीनाम्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन
उदगीर, (प्रतिनिधी) – भाजपचे आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे दुखावलेल्या सामाजिक भावनेला आवर घालता घालता भाजपच्या नेत्यांना नाकी नऊ आले आहे. त्यातच आता उदगीर-जळकोट विधानसभेचे भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मातंग समाजाला उद्देशून अपशब्द वापरला आहे. आपल्या आवेशपूर्ण भाषणात मातंग समाजाला “साडेसाती” अशी उपाधी देऊन हलगी वाजविणा-या व्यक्तीला पाचशे रुपयांत विकत घेण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने मातंग समाजात संताप व्यक्त होत असून भालेराव यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी लहुजी शक्ती युवा सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत रेणापूर येथे जलयुक्त शिवारचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जाहीर सभेत आमदार भालेराव यांनी अशी गरळ ओकली आहे. भालेराव हे या मतदार संघातून दोनवेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या कार्यकाळात देखील ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 2014 च्या मोदी लाटेत त्यांना पुन्हा लॉटरी लागली. मातंग समाजाचा चेहरा म्हणून त्यांना समाजबांधवांनी नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, त्यांनी रेणापूर येथील कार्यक्रमात नियोजित सत्कार समारंभाला उद्देशून त्यांनी मातंग समाजाची खिल्ली उडविली आहे.
येडं उठलं अन जावयाला भेटलं… साडेसाती मड्याला बांधून फिरल्यावानी… आणि वाजवायला आमच्याकडंच येतेत बया… ज्या बी गावात गेलं त्या गावात साडेसाती समोर माझ्याच. ये तु तिकडं जा जरा, तुला 500 रुपये नंतर देताव बाजुला हो म्हणताव मी त्याला. मरणाचं बी आम्हीच, लग्नाचं बी आम्ही… कुठला बी कार्यक्रम आम्हीच… असली साडेसाती आमच्या नशिबाला आहे. अशा प्रकारे भालेराव यांनी समाजाला उद्देशून अपशब्दांचा वापर भाषणात केला आहे. तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या अशा बोलण्यामुळे समाजबांधवांची मने दुखावली आहेत. त्यांनी समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे लातूर शहर आणि परिसरात मातंग समाजात संताप उसळला आहे. सोशल मिडियातून त्यांच्यावर शिवीगाळ केली जात आहे. भालेराव यांचा आमदारकीचा राजीनामा त्वरीत घेण्यात यावा, अशी मागणी लहुजी शक्ती युवा सेनेच्या कार्यकत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.