आरक्षण दहा वर्षांसाठी दिलं पण, संसदेने कालमर्यादा वाढवली – सुमित्रा महाजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/sumitra-mahajan.jpg)
नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रांची येथे ‘लोकमंथन २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोपाला सुमित्रा महाजन या उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं, की आरक्षण फक्त 10 वर्षांकरिता दिलं होते. दहा वर्षांत देशात समान विकास होईल असा त्यांचा अंदाज होता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. संसदेने दरवेळी आरक्षणाची कालमर्यादा वाढवली, आरक्षणानं देशाचं कल्याण होणार आहे काय ?, असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानं चालणं गरजेचं आहे. देशातील सामाजिक सलोख्यासाठी आपण डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मात्र, हे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
देशात महिलांचा आदर केला जात नाही. त्यामुळे देश पुढे जात नाही. महिला मागे राहिल्या तरी देशाचीही प्रगती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी विरोधकांवर टीका केली. देशातील काही इतिहासकार परदेशात भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करत आहेत. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देश आणि समाजाचे विभाजन करणाऱ्या वृत्ती सक्रीय आहेत. गोरगरीब आदिवासी जनतेला धर्मांतर करण्यास भाग पाडले. पण देशातील भाजपा सरकारने याविरोधात कायदा तयार केला, असे त्यांनी सांगितले.