आरक्षणावरुन दंगली घडविण्याचा सरकारचा डाव – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/resizemode-408.jpg)
पुणे – मुस्लिम धर्मीयांनी उत्तर देणे बंद केल्याने आता पुढील काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगली घडविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. सत्ताधाऱ्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, घटनेने दिलेले आरक्षण कोणीही काढून घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही त्यांनी भटक्या विमुक्त जमाती संघटनांच्या सातव्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या व्यासपीठावरून दिला.
“समाजात अस्थिरता माजवून आणीबाणी लादून निवडणुका लांबविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि आरएसएसचे कार्यकर्ते आरक्षण रद्द करण्याची मागणी करीत आहेत. पुढील काळात आरक्षणविरोधी आणि आरक्षणाच्या समर्थकांमध्ये दंगली घडविल्या जातील. मुस्लिम समाज त्यांना उत्तर देत नाही, त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरच दंगली घडविण्यात येतील. मुस्लिम समाजाप्रमाणेच आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांनी त्यांना उत्तर देणे टाळले पाहिजे. वातावरण तापविण्याचा त्यांचा हेतू साध्य होता कामा नये’, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयात उपस्थित राहिलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. “”ज्या कॉंग्रेस पक्षाने मुखर्जी यांना राष्ट्रपती केले, त्या पक्षाशीदेखील ते इमानदार राहू शकले नाहीत. देशाचे संरक्षण लष्कर करू शकत नसेल तर आरएसएस करेल, असे विधान करणाऱ्यांना त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख ते होते, त्यांनी जबाबदारीने त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे होते,” असे त्यांनी नमूद केले.