‘आडवे, तिडवे करायचे असेल तर करून टाकावे’, चंद्रकांत पाटील यांचे उध्दव ठाकरे यांना आव्हान
![Thackeray has paralyzed not only the hands of the government but also the intellect - Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/udhav-thackarey_chandrakant-patil.jpg)
पुणे / महाईन्यूज
”शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्रिपदावर काम करणा-या माणसाची असू शकत नाही. आडवे करायचं असेल, तिडवे करायचे असेल तर बोलायचे कशाला ? जे आहे ते करून टाकावं,” असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुलाखत दली. ही मुलाखत शुक्रवारी (27 नोन्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीत ‘कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.’ असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी केले. यावर बोलताना चंद्रकातं पाटलांनी वरील भाष्य केले. ते सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
“शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरसुद्धा उद्धव ठाकरे यांचं असंच भाषण झालं. शेण, गोमूत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसाची असू शकत नाही. त्यांना जर अशीच भाषा वापरायची असेल तर, सर्वसामान्य लोकांनासुद्धा जे सुरु आहे; ते बरोबर नाही हे समजत आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात
महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. यात राज्यातील कोरोना स्थिती, भाजपाकडून होणारी टीका, सरकारसमोरील आव्हान याबाबतची भाष्य करण्यात आलं आहे. ही मुलाखत शुक्रवारी (दि. 27 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. यावेळी, विरोधकांना उद्देशून “विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.