आजपासून…मी संत नाही शांत आहे, गोतावळ्यातून दुरावलो याची मनात खंत आहे – राजू शेट्टी
पुणे – लोकसभा निवडणुकीत हातकंणगले मतदारसंघाचा अनपेक्षित निकाल लागला. राजू शेट्टींचा पराभव होवून शिवसेनेचे धैर्यशील माने एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शेट्टींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून नवा एल्गार पुकारला आहे.
‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकरी चळवळीचे व्रत पुढे चालण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ‘ मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे , अशा भावना त्यांनी कवितेच्या आरंभी व्यक्त केल्या आहेत. मी खचलो नाही, थोडासा टिचलो आहे ..ते कोण मला बेदखल करणार ? मी बळीराजाच्या काळजातच, घर करून बसलो आहे ..असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांशी आपला ऋणानुबंध दर्शवला आहे.
म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा, नवा एल्गार करू.. ! गोरगरिबांच्या हक्कासाठी आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू…!! असा आशावाद व्यक्त करून त्यांनी आपली लढाई सुरूच असल्याचे अधोरेखित केले आहे.राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्य़ आणि देश पातळीवर आंदोलन करताना त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला याचाच फटका त्यांना बसला. याशिवाय जैन विरुद्ध मराठा असा संघर्षही परिणाम करणारा ठरला आहे.