जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!
![Three Lashkar-e-Toiba terrorists killed in Anantnag, Jammu and Kashmir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/armyy-1200-1.jpg)
जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीरमधील अनंतगनागमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते. या अगदोर ६ मे रोजी झालेल्या चकमकीत देखील तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होते. शिवाय, यावेळी एक दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केलं होतं. अनंतनागमधील चकमकीबाबत माहिती देताना काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे. अनंतनागमधील कोकरनाग भागात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांच्या एक संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. यास जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले, यावेळी झालेल्य चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.
#UPDATE All three terrorists killed in Anantnag encounter: IGP Kashmir Vijay Kumar #JammuAndKashmir pic.twitter.com/u6CMeD6fP0
— ANI (@ANI) May 11, 2021
ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक असलेला उबेद शफी याचा १ एप्रिल रोजी अरिबाग येथे भाजपा नेत्याच्य़ा घरावर लष्कर ए तोयबाकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस शिपाई रमीज राजा हे शहीद झाले होते. अशी माहिती काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे.