देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचा दावा
![There is no death due to lack of oxygen in the country; Central Government claims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/bharati_pawar.jpeg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत केला. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत त्यांनी निवेदन केले.राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालांच्या आधारावर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली. देशभरात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला होता. तरीही केंद्र सरकारने सभागृहात ही माहिती दिल्याने संताप व्यक्त होत आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल यांनी केला.ऑक्सिजनअभावी केवळ दिल्लीतच नाही तर प्रत्येक राज्यात करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात सभागृहात हक्कभंगाचा ठरावू आणू. त्यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला.
राज्यांवर दबाव नाही
याबाबत डॉ. पवार म्हणाल्या, ‘कोरोनासंबंधी आकड्यांशी छेडछाड करण्यासाठी केंद्राने कुठल्याही राज्यावर दबाव आणला नाही. राज्याकडून दिली जाणारी माहिती गोळा करण्याचे आणि ते जाहीर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. आम्ही कुठल्याही राज्याने दिलेल्या आकड्यांसोबत छेडछाड केलेली नाही. असे करण्याचे कुठलेही कारण नाही.’
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रस्त्यांवर आणि हॉस्पिटल्समध्ये मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. अनेक राज्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असा आरोप वेणूगोपाल यांनी केला.