लग्नाचं वऱ्हाड निघालं बैलगाडीतून, पवार कुटुंबीयांनी जपली जुनी परंपरा
![The wedding ceremony started in a bullock cart, an old tradition kept by the Pawar family](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-wedding-ceremony-started-in-a-bullock-cart-an-old-tradition-kept-by-the-Pawar-family.png)
जालना| जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आवलगांव बुद्रुक येथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. तुम्हाला वाटेल त्यात विशेष काय, आजकाल महागड्या आलिशान चारचाकी, डिजे, ऑर्केस्ट्रा लाऊन एवढंच काय हेलिकॉप्टर ने सुध्दा हौशी वऱ्हाडी वधूला घेवून जात आहेत. या आधुनिक धावपळीच्या युगात हे वऱ्हाड चक्क बैलगाडीतून आल्याने म्हणून तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
आधुनिकीकरण व धावपळीच्या या आधुनिक युगात विवाह सोहळा म्हटले की एक दिवसीय जंगी थाटमाट, आलिशान गाड्या तसेच डीजेच्या गाण्यावर नृत्य असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. ऐन लग्नाच्या वेळी नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी, सगेसोयरे येतात. लग्न लागले जेवणं झाली की वऱ्हाडी काढता पाय घेतात. परंतु घनसावंगी तालुक्यातील आवलगांव बुद्रुक येथे नुकताच १५ एप्रिल २०२२ रोजी अंकुशराव पवार यांचे चिरंजीव नागनाथ पवार व कचरू निचळ यांची कन्या वर्षा निचळ यांचा विवाह सोहळा पार पडला.
बैलगाडीतून निघालं वऱ्हाड…
विवाह सोहळा म्हटले की प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी आलिशान गाड्या तर कुणी हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. परंतु वाढत्या महागाईमुळे विवाह सोहळा पार पाडण्यासाठी गरीबांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आवलगांव बुद्रुक येथील अंकुशराव पवार यांनी आपल्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. यांमध्ये नवरी मुलीचे घर गावात तर नवरदेवाची घर शेतात. त्यामुळे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विवाह सोहळ्यासाठी नवरदेवाचे वडील अंकुशराव पवार यांनी चक्क बैलगाडीतून वऱ्हाड आणल्याने तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला…
बैलगाडीतून वऱ्हाड आल्याने अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. करोनाच्या काळानंतर बराच वेळ सगळ्या नातेवाईकांनी बैलगाडीत बसून प्रवास केल्याने सगळ्यांची विचारपूस झाली, सुख दुःखाच्या गोष्टी तर झाल्याचं पण व्हिडिओ कॉलच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकमेकांना डोळेभरून पाहिल्याने वऱ्हाडी मंडळींना आलेला भावना काही वेगळीच होती.
दरम्यान, नातेसंबंधांची नाळ घट्ट बांधणाऱ्या या विवाहाला बैलगाडीत झालेला वऱ्हाडी मंडळींचा प्रवास एक चांगली मनोमिलनाची गाठ बांधून गेल्याने कित्येकांना जुन्या जमान्यातील ग्रामीण भागातील लग्नाची आठवण देखील देऊन गेला.