“शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,” भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान
बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता नसरुद्दीन शाह आणि गीतकार जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केलं जात असल्याची टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.
“शबाना आझमी, नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर हे स्लीपर सेल असणाऱ्या तुकडे-तुकडे गँगचे एंजट असून, फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांवर वाद निर्माण करतात,” असा नरोत्तम मिश्रा यांचा आरोप आहे. बिल्किस बानो प्रकरणी आरोपींची १५ वर्षानंतर कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शबाना आझमी यांनी जोरदार टीका केली आहे.
“माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. मला प्रचंड लाज वाटत आहे. याशिवाय माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही,” असं शबाना आझमी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं होतं. नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी काँग्रेसशासित राज्यांमधील मुद्द्यांवर मात्र भाष्य करत नसल्याची टीका केली आहे.
शबाना आजमी, नसीरुद्दीन शाह जैसे लोग टुकड़े-टुकड़े गैंग के स्लीपर सेल के एजेंट है जो सिर्फ भाजपा शासित राज्यों में हुई घटनाओं पर ही हल्ला मचाते हैं, जबकि कांग्रेस शासित राजस्थान और झारखंड जैसे राज्यों में हो रही घटनाओं पर मौन रहते हैं। अब ऐसे लोगों की कलई खुल चुकी हैं। pic.twitter.com/fPpaTLKbzx
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) September 2, 2022
ते म्हणाले “राजस्थानमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली किंवा झारखंडमध्ये महिलेला जिवंत जाळलं यावर शबाना आझमी काही भाष्य करत नाहीत”. “तुकडे-तुकडे गँग किंवा अवॉर्ड वापसी गँगला हे अजिबात दिसत नाही. यावरुन त्यांची वाईट विचारसरणी उघड होत आहे. कोणीही त्यांना सुसंस्कृत किंवा धर्मनिरपेक्ष कसं काय म्हणू शकतं?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
शबाना आझमी यांनी नुकतंच बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात महिला संघटना आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.