पीएमसीच्या बँकेच्या ठेवीदारांना दिलासा; ३० नोव्हेंबरपर्यंत ५ लाख परत मिळणार
नवी दिल्ली – डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विधेयक २०२१ संसदेने संमत केले आहे. त्याचा कायदा आजपासून लागू झाला आहे. त्यात बुडीत बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याची तरतूद आहे. यामुळे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेसह इतर बँकांच्या ठेवीदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत ५ लाखांपर्यंतच्या ठेवींचे पैसे परत मिळणार आहेत.
एखादी बँक बुडाल्यास संबंधित बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळत होत्या. परंतु केंद्र सरकारने या कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्याबाबतचे विधेयक नुकतेच संसदेने मंजूर केले आहे. या नवीन कायद्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. २७ ऑगस्टला या नवीन कायद्याची अधिसूचना जारी झाली होती. त्यानुसार बँकेतील ५ लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना विमा संरक्षण मिळाले आहे. याशिवाय त्यांना ९० दिवसांच्या आत ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याची तरतूद या सुधारित कायद्यात आहे. हा कायदा लागू झाला असल्यामुळे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेसह इतर बुडीत बँकांच्या ठेवीदारांचे पैसे ३० नोव्हेंबरपर्यंत परत मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या या नव्या कायद्याचा फायदा २३ सहकारी बँकांमधील ठेवीदारांना होणार आहे. त्यांना आता ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याची हमी मिळाली आहे.