रावेत, किवळेच्या विकासाचे शिल्पकार : बबनराव भोंडवे ते तानाजी भोंडवे!
लोकसेवेचा वारसा आजही अखंड : प्रभाग 16 मधून आशा भोंडवे निवडणुकीच्या रिंगणात
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी। पुणे–पिंपरी चिंचवडमधील वेगाने विकसित होणाऱ्या रावेत आणि किवळे उपनगरांच्या जडणघडणीत भोंडवे कुटुंबाचे योगदान निर्णायक ठरले आहे. आज या परिसरात दिसणारा शहरी विकास, आधुनिक गृहसंकुले आणि नागरी सुविधा यामागे केवळ बदलती काळाची गरज नाही, तर दिवंगत बबनराव बाळाजी भोंडवे ते तानाजी बबनराव भोंडवे या पिढ्यान्पिढ्यांच्या लोकसेवेचा अखंड वारसा आहे.
विशेष म्हणजे, आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भोंडवे परिवारातील आशा तानाजी भोंडवे या प्रभाग क्रमांक 16 किवळे-मामुर्डी-विकासनगर- रावेत- गुरूद्वारा परिसरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. ही निवडणूक केवळ पदासाठी नव्हे, तर लोकसेवेचा वारसा आजही अखंड सुरू ठेवण्यासाठी लढत आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

१८०० एकर जमिनीचा लढा आणि विकासाची पायाभरणी…
रावेतच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न. एकेकाळी रावेत व किवळे परिसरातील सुमारे १८०० एकर जमीन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. ही जमीन गेली असती, तर आजचा रावेत-किवळेचा विकासच प्रश्नचिन्हात आला असता. या निर्णायक क्षणी बबनराव भोंडवे यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळली. राज्याचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या चिकाटीमुळे ही जमीन वाचली आणि रावेत-किवळेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. आज उभ्या असलेल्या गृहसंकुलांचा आणि वाढत्या नागरी वसाहतींचा पाया याच संघर्षातून घातला गेला.
सहकारातून समाजकारण…
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून बबनराव भोंडवे यांनी सहकार चळवळीला बळ दिले. त्यांच्या कार्यकाळात केवळ कारखान्याचा विस्तार झाला नाही, तर शेकडो स्थानिकांना रोजगार मिळाला. चेअरमन असतानाच त्यांचे निधन झाले, मात्र त्यांनी रुजवलेली समाजसेवेची बीजे आजही फुलताना दिसतात.
तानाजी भोंडवे : वारशाला कृतीची जोड…
वडिलांच्या पश्चात तानाजी भोंडवे यांनी हा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेला. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारीने काम केले. पदापेक्षा माणूस महत्त्वाचा, ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे.
रावेत-किवळेच्या विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा…
रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी महापालिका आणि संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, नागरिकांचे प्रश्न थेट मांडणे—या बाबींमध्ये तानाजी भोंडवे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. स्थानिक तरुणांना साखर कारखाना आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
‘एका फोनवर हजर’ असलेले नेतृत्व…
रावेत आणि किवळे परिसरातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच तानाजी भोंडवे यांची खरी ओळख आहे. लग्नकार्य असो, आजारपण असो किंवा दुःखद प्रसंग—“एका फोनवर हजर होणारा नेता” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
विकासाच्या इतिहासात ठसा अढळ…
एकेकाळी रावेत-किवळेच्या विकासाची दिशा ठरवताना भोंडवे कुटुंबाचा शब्द निर्णायक मानला जात असे. आजही त्यांच्या कार्याची छाप समाजकारणात आणि राजकारणात दिसून येते. बबनराव भोंडवे ते तानाजी भोंडवे असा लोकसेवेचा प्रवास हा रावेत-किवळेच्या विकासाच्या इतिहासात अखंड आणि प्रेरणादायी ठरला आहे.





