‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/RAHUL-GANDHI.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या परिस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका करत आहेत. त्यात त्यांनी आजही मोदींवर टीकास्त्र सोडलं. ‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’ असं म्हणत राहुल गांधी यांनी आपलं ट्विटर वॉर सुरूच ठेवलं आहे.
सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी काल केंद्र सरकावर टीका केली होती. भारतात लसींचा पुरेसा स्टॉक उपलब्ध नसतानाही सरकराने तिसऱ्या टप्प्याती लसीकरणाला सुरुवात केली असं सुरेश जाधव म्हणाले होते. शिवाय, केंद्र सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीकडेही दुर्लक्ष केल्याचं म्हटलं. त्यांची हीच बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
एक तो महामारी,
उस पर प्रधान अहंकारी! pic.twitter.com/fO0GzXBpvL— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 23, 2021
जाधव नेमकं काय म्हणाले?
जागतिक आरोग्य संघटनेची गाईडलाईन्स लक्षात घेऊन लसीकरणाला प्राधान्य द्यायला हवे होते. सुरुवातीला 30 कोटी लोकांना व्हॅक्सिन द्यायची होती. त्यासाठी 60 कोटी डोसची गरज होती, असं जाधव यांनी सांगितलं होतं. लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. यातून उत्पादनाची उपलब्धता पाहिली पाहिजे आणि न्यायसंगत पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळते, असंही ते म्हणाले होते.