“राहुल गांधी हे केवळ फोटो आणि धरणं आंदोलनासाठ: गुलाम नबी आझाद
![“Rahul Gandhi only for photos and dharna agitation: Ghulam Nabi Azad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Ghulam-Nabi-Azad-Rahul-Gandhi.jpg)
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधत आझाद यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा आझाद यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी पक्षासाठी नव्हे तर केवळ फोटो आणि धरणं आंदोलनासाठी योग्य आहेत, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
“राहुल गांधी यांनी पक्षासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. सर्व काही एका पत्रामध्ये लिहून राजीनामा देण्याचा माझा उद्देश होता. मात्र, राजीनामा दिल्यानंतर पक्षाने माझ्यावर खोटे आरोप करुन मला भडकवण्याचा प्रयत्न केला,” अशी प्रतिक्रिया गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.
“राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक निर्णय घेतात”
“राहुल गांधींचे संघटनेच्या पुनर्बांधणीवर लक्ष नाही. ते फोटो आणि धरणं आंदोलन, सार्वजनिक रॅलींसाठी योग्य आहेत. प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला माहिती आहे की राहुल गांधींचे सुरक्षा रक्षक अथवा पीए पक्षातील निर्णय घेतात,” असा निशाणा पुन्हा एकदा आझाद यांनी राहुल गांधीवर साधला आहे.
“चौकीदार चोर अजेंडा मान्य नाही”
राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देत मोदी सरकारविरुद्ध रान उठवलं होते. त्यावर देखील आझाद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “प्रत्येक जाहीर सभेत ‘चौकीदार चोर है’ हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. चौकीदार चोर हा अजेंडा मला मान्य नव्हता. महागाई आणि बेरोजगारी हा मुद्दा त्यावेळी नव्हता का?,” असा सवालही गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला आहे.