पंतप्रधान मोदींनी चार महिन्यांनंतर ‘मन की बात’मधून साधला संवाद; देशवासियांना केल ‘हे’ आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-27-1-780x470.jpg)
Mann Ki Baat : लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाच्या 111 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या कुटुंबियांमध्ये आलो असल्याचे म्हणत निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान त्यांचे आभार मानले. तसेच यावेळी मोदींनी ‘एक पेड माँ के नाम’ या नव्या अभिनयाची घोषणा देखील केली.
देशातील लोकशाही व्यवस्थेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशाच्या लोकशाही प्रणालींवरील अतूट विश्वासाचा पुनरुच्चार केला आहे. 2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो.
पीएम मोदी म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे. हे लक्षात घेऊन यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचे नाव ‘एक पेड माँ के नाम’ असे आहे. मी माझ्या आईच्या नावाने एक झाडही लावले आहे. जगातील सर्व देशातील लोकांनी आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावावे आणि तिच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले जावे,” असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे.
ते म्हणाले, पृथ्वीही आपली आईप्रमाणे काळजी घेते. पृथ्वी माता ही आपल्या सर्वांसाठी जीवनाचा आधार आहे, म्हणून पृथ्वी मातेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. तुमच्या आईच्या नावाने एक झाड लावून तुम्ही तुमच्या आईचा सन्मान तर करालच पण पृथ्वी मातेचे रक्षणही कराल.
या महिन्यात संपूर्ण जगाने 10 वा जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित योग कार्यक्रमातही मी सहभागी झालो होतो. काश्मीरमध्ये युवकांसोबतच भगिनी आणि मुलींनीही योग दिनात उत्साहाने सहभाग घेतला. जसजसा योग दिन साजरा होत आहे तसतसे नवनवीन विक्रम होत आहेत.
पुढील महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक या वेळेपर्यंत सुरू झाले असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मी भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत. टोकियोमधील आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले होते, तेव्हापासून आमचे खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त होते. नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत. आमच्या नेमबाज मुलींचाही भारतीय शॉटगन संघात समावेश आहे.
मोदी म्हणाले की, आज 30 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अदम्य धैर्याशी संबंधित आहे. शूर सिद्धो-कान्हूंनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध 1855 मध्ये दातखिचीत लढा दिला. म्हणजे 1857 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी, जेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती.