#MeToo : १० वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप करुन काय उपयोग? : भाजपा खासदार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/udit-raj.jpg)
दिल्ली – लैंगिक गैरवर्तन किंवा अत्याचाराबद्दल बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह प्रसारमाध्यमं व अन्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला जाहीरपणे बोलू लागल्या असतानाच भाजपा खासदार डॉ. उदित राज यांनी मात्र ‘मी टू’ (#MeToo) या चळवळीबाबत नाराजी व्यक्त केली. ‘मी टू’सारखी चळवळ आवश्यक आहे. पण एखाद्या व्यक्तीवर दहा वर्षानंतर लैंगिक शोषण किंवा गैरवर्तनाचा आरोप करुन काय उपयोग?. या चळवळीतून चुकीच्या प्रथेला सुरुवात होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. उदित राज हे भाजपाचे दिल्लीतील खासदार आहे. उदित राज यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरच्या माध्यमातून सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मी टू’ चळवळीबाबत भाष्य केले. ते म्हणतात, ‘मी टू’ सारखी चळवळ आवश्यक आहे. पण एखाद्या व्यक्तीवर १० वर्षांनंतर लैंगिक शोषणाचे आरोप करुन काय उपयोग?, इतक्या वर्षांनंतर या आरोपांमधील सत्यता कशी पडताळून पाहता येईल?, ज्या व्यक्तीवर हे आरोप केले जातील त्या व्यक्तीच्या प्रतिमेचे किती नुकसान होईल हे देखील बघितले पाहिजे. ‘मी टू’ चळवळीतून एका चुकीच्या प्रथेला सुरूवात होत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणारी तरुणी तिच्या पार्टनरवर बलात्काराचे आरोप करुन पोलिसांकडे गुन्हा दाखल करु शकते आणि तो तुरुंगातही जाऊ शकतो. हे कसं शक्य आहे?, असा अनुभव रोज येतोच आहे. ब्लॅकमेलिंगसाठी तर याचा वापर होत नाही ना?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर बॉलीवूडच्या आणखी काही अभिनेत्रीही आपल्या बाबतीतही असेच घडले होते, असे म्हणत आपल्यावरील कथित अत्याचाराबद्दल जाहीरपणे बोलू लागल्या आहेत. कंगना राणावतने ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तर अलोक नाथ यांच्यावरही विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे.