#Lockdown: लॉकडाउनदरम्यान जेवण मिळत नाही म्हणून पाच मुलांना गंगेत फेकलं
उत्तराखंडमधील भदोई जिल्ह्यातील जहांगीराबादमध्ये रविवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील एका महिलेने लॉकडाउनच्या कालावधीमध्ये जेवण मिळत नसल्याच्या नैराश्येमध्ये आपल्या पाच मुलांना गंगेत फेकून दिलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डायव्हर्सच्या मदतीने मुलांचा शोध सुरु केला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ठिक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून या महिलेला आणि तिच्या मुलांना लॉकडाउनमुळे पुरेसे अन्न मिळत नसल्याची तक्रार तीने वारंवार केली होती. मजूरी करुन पोट भरणाऱ्या या महिलेची कमाई मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद होती, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. “मुलांचा शोध घेण्याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी नंतर करु,” अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
करोनामुळे देशामध्ये २४ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या कालावधीमध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे आणि कामगारांचे खूप हाल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लॉकडाउनमुळे सर्व कारखाने आणि कामं बंद राहणार असल्याने अनेक मजूर पायी चालत आपल्या राज्यांमध्ये परत निघाल्याचे चित्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पहायला मिळालं. त्यानंतर स्थानिक राज्य सरकारांनी पुढाकार घेत या मजुरांच्या जेवणाची आणि राज्याची सोय केली आहे.