#Lockdown: आजपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/toll.jpg)
आजपासून (सोमवार) राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मध्यरात्रीपासून टोल वसुलीला सुरूवात केली. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं २५ मार्चपासून टोलवसूली तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा एकदा ही टोल वसूली सुरू करण्यात आली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं २५ मार्चपासून टोलवसूली तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आजपासून पुन्हा एकटा टोल वसूली सुरू झाली आहे. यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व ट्रक आणि मालवाहू वाहनांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी जी सुट देण्यात आली आहे ती ध्यानात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर योग्य ती कारवाई करावी. तसंच २० एप्रिल २०२० पासून टोलवसूली सुरू करण्यात आली पाहिजे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
टोल वसूलीतून महसूल
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्राला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि माहमार्ग मंत्रालयानं ११ एप्रिल आणि १४ एप्रिलला एक पत्र लिहिलं होतं. गृह मंत्रालयानं व्यावसायिक आणि खासगी संस्थांनांच्या वाहतुकीसह अन्य कामांसाठी २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केलेल्या टोलवसूलीपासून सरकारला महसूल मिळतो, असंही त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
वाहतूक क्षेत्राचा होता विरोध
वाहतूक क्षेत्राशी निगडीत ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेसनं सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. तसंच हा चुकीचा निर्णय असल्याचं म्हटलं होतं. सध्या अनेक समस्यांचा सामना करत आम्ही जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं होतं.