देशात 24 तासांत 40 हजारांहून कमी नवे कोरोना रुग्ण; 1 हजाराहून कमी कोरोनाबळी
![14,623 new corona patients, 197 corona victims in 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/corona-1.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यंदा २१ एप्रिलला देशात पहिल्यांदाच दिवसभरात तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात आढळलेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. धक्कादायक बाब म्हणजे या दिवसानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर ६ मेपासून भारतातील दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल ४ लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र १० मेपासून ही संख्या ४ लाखांच्या आत आहे. तर ८ जून रोजी दैनंदिन रुग्णवाढ ही १ लाखांच्या आत आली. तसेच २२ जून रोजी ५० हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात मागील 24 तासांत 37,566 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 907 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,03,16,897 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 3,97,637 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 56,994 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 2,93,66,601 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 5,52,659 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
India reports 37,566 new #COVID19 cases, 56,994 recoveries, and 907 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,03,16,897
Total recoveries: 2,93,66,601
Active cases: 5,52,659
Death toll: 3,97,637 pic.twitter.com/BK1Gi9IHSP— ANI (@ANI) June 29, 2021
मागील वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर २२ एप्रिलला दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ३ लाखांचा टप्पा ओलांडला आणि ६ मे रोजी ४ लाखांचा टप्पा पार केला. त्यामुळे चिंता प्रचंड वाढली आहे. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू असले, तरी देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार असल्याने सर्वांनी आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.