जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भयंकर हल्ला
दहशतवादी हल्ल्यात पाच जण जखमी, दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू
![Jammu and Kashmir, Terrorists, Attacks, Kathua, five, people,, injured,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/jk-780x470.jpg)
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भयंकर हल्ला केला असून त्यामध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. कठुआ येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कराद्वारे सर्च ऑपरेशन सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. यादरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले आणि अंदाधुंद गोळीबारही केला. सुरुवातीला 6 जवान जखमी झाले, त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर काही वेळाने आणखी एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली.
कथुआ जिल्ह्यात मागील दोन दिवसांत दहशतवाद्यांबरोबरील ही तिसरी चकमक असून महिनाभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. काल लष्कराचे जवान लोहाई मल्हार भागातील मचेदी-किंदली-मल्हार रस्त्यावरून गस्तीसाठी जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गाडीवर अचानक हल्ला केला. त्यांनी ग्रेनेड फेकत अंदाधुद फायरिंग केले.
हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू
या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या आतापर्यंत 5 झाली आहे. हल्ल्यानंतर, पाच जवानांना प्रथम कठुआ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु रात्री उशिरा त्यांना पठाणकोट येथील लष्करी रुग्णालयात रेफर करण्यात आले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
जवांनांनी दिले चोख प्रत्युत्तर
या हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र तोपर्यंत दहशतवादी जंगलात आत पळून गेले. दहशतवाद्यांना शोधून मारण्यासाठी अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती मात्र दहशतवाद्यांना शोधून काढण्यात सुरक्षा दलांना अद्याप यश मिळाले नाही. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. जंगलात हा दहशतवादी हल्ला कुठे झाला त्याचे नेमके ठिकाण ओळखण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 2 ते 3 दहशतवादी सहभागी असू शकतात. दहशतवाद्यांसोबत त्यांचे स्थानिक समर्थकही होते, ज्यांनी त्यांना रस्ता दाखवण्यात मदत केली, अशी माहिती समोर आली आहे. अधिकाधिक जवानांना मारण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. त्यांनी सोबत आधुनिक शस्त्रे आणली होती, असेही समजते.