सांगली जिल्ह्य़ाच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपले
![Heavy rains lashed the Ghats of Sangli district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/rain-2-1.jpg)
सांगली |
जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील खानापूर घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपले असून सलग तीन तासांच्या संततधार पावसाने दुष्काळी भागातील अग्रणी नदी हंगामात पहिल्यांदाच वाहती झाली. रविवारी सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात सरासरी १८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
खानापूर घाटमाथ्याला शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे तीन तास पडलेल्या पावसामुळे सर्व पाझर तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ओढे, नाले वाहू लागले आहेत. सखल भागात तसेच तालीच्या रानात तुडुंब पाणी साचले आहे. परिणामी खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. अग्रणी नदी या हंगामात भरून वाहती झाली. खानापूर पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. सांडव्यावरून मोठय़ा प्रमाणात पाणी पडत असल्याने खानापूर पाझर तलावाचा नयनरम्य धबधबा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुरू झाला आहे.
खानापूर,तामखडी, पोसेवाडी, अडसरवाडी, मोही, सुलतानगादे, भिवघाट, हिवरे, पळशी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सुलतानगादे साठवण तलावाच्या पाणी साठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १८.३ मि. मी. पावसाची नोंद झाली असून खानापूर-विटा तालुक्यात ३९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १८ (३२१.८), जत १९.१ (२८३.६), खानापूर-विटा ३९.१ (२०५.२), वाळवा-इस्लामपूर ५ (३०५.२), तासगाव १९.२ (२८०.९), शिराळा ८.४ (४४९.२), आटपाडी ०.४ (२१९.८), कवठेमहांकाळ ३२ (२४५.२), पलूस ९ (२९४.३), कडेगाव २१.२ (२२२.७).