सरकारी कर्मचाऱ्यांचा मागील वर्षाचा महागाई भत्ता १ ऑक्टोबरपासून मिळणार
मुंबई – ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मागील वर्षी रोखलेला महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारी ते १ जून २०२१ पर्यंतचा महागाई भत्त्याचा दर १७ टक्के निश्चित करण्यात आला असून तो १ ऑक्टोबरपासून रोखीने दिला जाणार आहे. तसेच १ जूननंतरचा वाढीव भत्ता २८ टक्के इतका वाढीव स्वरूपात दिला जाणार आहे मात्र त्याची तारीख अजून ठरवलेली नाही.
या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिलासादायक निर्णयाबाबत स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार असून तसे या निर्णयात स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांचा १७ टक्के महागाई भत्ता हा कोरोना काळात रोखला होता. मात्र राज्यातील कोरोना नियंत्रणात येऊन आर्थिक बाजारपेठाही पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. साहजिकच त्यामुळे सरकारी तिजोरीतही भर पडू लागली आहे. त्यामुळेच सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा रोखलेला निधी आणि जनतेच्या विकासकामाचा निधी हळूहळू बाहेर काढायला सुरुवात केली आहे. असे असले तरी सरकारचे कर्ज रोखे धोरणही सुरूच राहणार असल्याने त्याचा जनतेच्या माथ्यावरील बोजा काही कमी होणार नाही. तो तसाच राहणार आहे.