औरंगाबादेत पुन्हा गुंडांचा राडा; कामगाराला कोयत्याने मारहाण करत लुटले, शहरात दहशत
![Goons rally again in Aurangabad; Workers were beaten and robbed with scythe, terror in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Goons-rally.jpg)
औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शहर आता ‘क्राईम कॅपिटल’ बनत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी वाळूज भागात तडीपार गुंडाच्या टोळक्याने लोकांना अडवून लूटमार करत असल्याच्या घटनेनंतर आता, पुन्हा गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगाराला अडवून तीक्ष्ण हत्याराने वार करत लुटल्याची धक्कादायक घटना वाळूज एमआयडीसी भागात घडली आहे. अभिषेक कैलास बड़क (वय 21, पवननगर रांजणगाव शे.पु. ता. गंगापुर जि. औरंगाबाद ) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
अभिषेक यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते रांजनगाव येथून रस्त्याने पायी मायलान कंपनीत कमाला जात असतांना लक्ष्मी कंपनीच्या गेटच्या समोरील रोडच्या बाजुला पोहचले असता, तेथे दोन अनोळखी इसम अभिषेक यांच्याजवळ येऊन, तुझ्या जवळ काय काय आहे ते काढून दे, अशी धमकी देऊ लागले. मात्र त्याला विरोध केल्याने एकाने पाठीमागून पकडले तर दुसऱ्याने हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याऱ्याने डाव्या आणि उजव्या हातावर तसंच दोन्ही दंडावर वार केले. त्यानंतर मोबाईल आणि खिशातील पॉकेट काढून घेऊन आरोपी फरार झाले.
औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुंडांची दहशत वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच वाळूजच्या प्रतापनगर भागात एक तडीपार गुंड आणि त्याच्या टोळक्याने लोकांना रस्त्यावर अडवून पैसे उकळण्यासाठी दहशत निर्माण करत असल्याची घटना समोर आली होती. त्यापूर्वी सुद्धा शहरात टोळक्याकडून एका मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे शहरात गुंडांची दहशत वाढली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.