गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ दोन दिवसांत पुन्हा झळकणार मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसात नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धेत केली. दशसूत्रीचा फलक हटविण्यात आल्याचे कळताच राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त व्हायला लागल्या. ही बाब लक्षात घेऊन फडणवीसांनी तत्काळ ही घोषणा केली.
विशेष म्हणजे, याबाबत ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने वृत्त देताच सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. जिल्हा नियोजन मंडळाची सभा आटोपल्यावर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी या घडामाेडीवर भाष्य केले. ते म्हणाले की फलक काढण्यात आलेला नाही. फलकावर रेघोट्या उमटल्या होत्या. विद्रूप दिसत असल्याने तो काढण्यात आला. नव्याने तयार करून तो फलक दोन दिवसात लावण्यात येईल.
नुकसान भरपाईचा ५२ टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे दिले आहेत. त्यापैकी ५२ टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मदत दिली जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत संवेदनशील आहेत. सार्वत्रिक सौर ऊर्जाकरण प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांची जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊन वीज पंपासाठी त्याद्वारे ऊर्जा पुरवठा करण्याची भूमिका आहे. अमृत योजनेत रस्ते खराब झाल्याची ओरड होत आहे. आमदार डॉ. भोयर यांनीही हा प्रश्न वारंवार उपस्थित केला. याबाबत पुढे तक्रार राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.