उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात दिवसभर जाणवतोय गारवा
![In the next three to four days, the cold in the state including Mumbai will increase further](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/thandi.jpg)
नाशिक | प्रतिनिधी
सध्या उत्तर भारतातील थंडीची लाट व तिकडून ताशी चार ते पाच किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात तुलनेने थंडी अधिक आहे. तर ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात अंशत: वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून विदर्भात गारपिटीसह पाऊस, तर मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण व वाऱ्यांमुळे दिवसभर गारवा जाणवत आहे. थंडीचा गहू, हरभरा पिकांसाठी लाभ होत असला तरी ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी सांगितले.
उत्तर कर्नाटक ते ओडिशादरम्यान १ किलोमीटरवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आगामी दोन दिवसांत विदर्भात मध्यम पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तसेच उत्तर वायव्य भारतात १६ आणि १८ जानेवारीला पश्चिमी चक्रावात येणार आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार असून तिकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार आहे. दरम्यान, फैजपूर बस स्थानकात एका अनाेळखी वृद्ध नागरिकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. थंडीत गारठल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.