देशात कोरोना रुग्णांमध्ये घट, कोरोनाबळी वाढले
![Decrease in corona patients in the country, increased corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Corona.jpg)
नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे, तर पाच लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,९९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, मात्र यावेळी कोरोनाबळींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २४ तासांत १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. आधीच्या दिवशी ४,३६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि ६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे.
दरम्यान, देशात सध्या ४९,९४८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत ५,१५,२१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४,२४,६,१५० कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तसेच देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १७९.१३ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी उन्हाळ्यात आर्द्रता वाढल्याने विषाणू आणखी पसरणार असल्याचे संकेत दिले आहेत. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे हे आहे. तसेच कोरोना चाचणी आणि लसीकरणावर भर देण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग कमी होत आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ आता चौथ्या लाटेबाबत भाष्य करत आहेत.