#CoronaVirus | मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका : मुख्यमंत्री
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आपण कोरोना संसर्गाच्या निर्णायक टप्प्यावर असल्याची माहिती दिली. तसेच मला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका, असा सल्लाही दिला आहे. त्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे.”
पुढील 15 दिवस गांभीर्याने वागण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा. व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या शहरांमध्ये ताकदीने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.