Coronavirus: देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे मोठे संकट उभे,तरी सरकार अजूनही गुंगीतच- राहुल गांधी
कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण ही गंभीर समस्या आहे. पण सरकार अजूनही गुंगीतच आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर केली.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मी पुन्हा पुन्हा हे सांगत राहिन. कोरोना व्हायरस ही गंभीर समस्या आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करणे हे काही त्यावरील उत्तर नाही. जर आत्ताच गंभीर उपाय केले गेले नाहीत तर भारतीय अर्थव्यवस्था कोसळेल. पण सरकार अजूनही गुंगीतच आहे.
कोरोना व्हायरसच्या जागतिक संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात शुक्रवारी मोठी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात तर लोअर सर्किट लावावे लागले इतकी घसरण जास्त होती. गुरुवारीही या दोन्ही शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याचे दिसले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारकडे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.भारतात आतापर्यंत ७५ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले आहे. तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.