#CoronaVirus: कोरोनाबाबत भारताचं एक महत्त्वाचं पाऊल, क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जाणार
कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत चालली असताना आता भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे आजारी पडलेल्या आणि गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय येत्या काळात जीव वाचवणारा आणि आरोग्यदायी ठरू शकतो. अर्थात या चाचणीचे निकाल सकारात्मक आले तरच त्याचा उपयोग उपचाराचा भाग म्हणून केला जाईल.
कोरोना विषाणूमुळे झालेल्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराविरोधात लढल्यामुळे एँटिबॉडिज तयार झालेल्या असतात. रक्तातील महत्त्वाचा घटक असलेल्या प्लाज्मामध्ये या एँटिबॉडिज असतात. त्यामुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाज्मा कोरोनामुळे गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये वापरून त्यातून त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. भारतात या स्वरुपाच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गंभीर बनलेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे अमेरिकेतील नियतकालिक ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स’ने म्हटले आहे. आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने या स्वरुपाच्या उपचार पद्धतीसाठी नियम आखण्यास सुरुवात केली आहे. एकदा हे नियम तयार झाल्यानंतर त्याचा मसुदा भारताच्या औषधे महानियंत्रकांकडे पाठविला जाईल. त्यांच्या औपचारिक मंजुरीनंतरच या स्वरुपाच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू होतील.
जे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातील प्लाज्मामध्ये या विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एँटिबॉडिज तयार असतात. त्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्या रुग्णांना होऊ शकतो, असे दिसून आले आहे. मेदांतामधील वरिष्ठ डॉक्टर सुशिला कटारिया यांनी असे करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील इंटरफेरॉनही कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.