5 जी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया ऑगस्टपर्यंत होणार पूर्ण; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
![5G spectrum auction process to be completed by August; Information of Union Ministers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/images-97.jpeg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 5 जी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. स्पेक्ट्रम लिलावासाठीच्या सर्व बाबींची तयारी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरु होईल आणि ऑगस्टपर्यंत स्पेक्ट्रमची विक्री केली जाईल. यानंतर खाजगी दूरसंचार कंपन्या 5 जी सेवा देऊ शकतील, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेल्या 5 जी मुळे इंटरनेट सेवा वेगवान होणार आहे. 5 जी सेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने सध्या दूरसंचार नियामक प्राधिकरण या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांशी चर्चा करीत आहे. याबाबत मार्चपर्यंत अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. तसेच 5 जी सेवा देण्यासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आवश्यक सामुग्री लागणार आहे. त्याची जुळवाजुळव कंपन्यांकडून लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलिकडेच संसदेत अर्थसंकल्प सादर करताना येत्या वर्षभरात 5 जी सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती दिली होती.