संजय राऊतांच वक्तव्य चुकीचं, भविष्यात कॉंग्रेस हे खपवून घेणार नाही
मुंबई | महाईन्यूज
शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी एका कुख्यात गुंडा भेटल्या होत्या, असे विधान केले होते. त्यावरून कॉंग्रेसमध्ये संताप उसळला असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कडाडून टिका केली आहे. यापुढे काँग्रेस आपल्या नेत्यांबद्दल होणारी अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी संबंधित वक्तव्य मागे घेतलं असून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील संजय राऊत यांचं वक्तव्य चुकीचं असून त्यावर आमची नाराजी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं होतं. थोरात यांनी याबाबतची नाराजी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी त्यांचं विधान मागे घेतलं आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला. भविष्यात राऊतांनी विचारपूर्वक विधानं करावीत, आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असा इशारा थोरात यांनी दिला आहे.
थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. त्यांनी 1975 मध्ये मुंबईतील आणि देशातील गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम केलं. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ज्या करीमलालाबद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, असंही थोरात यांनी नमूद केलं.