वायसीएममध्ये डॉक्टर, कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे काम करावे – महापौर राहूल जाधव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC_2606a.jpg)
- वायसीएममधील डॉक्टरांची महापौरांनी घेतली बैठक
- रुग्णांच्या संदर्भात दिल्या महत्वाच्या सूचना
पिंपरी – पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असल्याने सामान्य नागरीक व गरीब रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत. यासाठी डॉक्टर, कर्मचारी यांनी प्रमाणिकपणे काम केले पाहिजे. त्यासाठी जे सहकार्य हवे ते केले जाईल, असे आश्वासन महापौर राहूल जाधव यांनी दिले.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर जाधव यांनी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत अधिका-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य सुजाता पालांडे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, उपअधिक्षक डॉ. शंकर जाधव तसेच वायसीएमचे डॉक्टर व नर्सेस आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, विविध रुग्णांना भेट देण्यासाठी वायसीएममध्ये नेहमी येणे होते. डॉक्टरांनी प्रामाणिक काम करताना जबाबदारी व कर्तव्य याच्या पलीकडे जाऊन सैनिक म्हणून काम केले पाहिजे. डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरता कामा नये. सीएमओ वॉर्डमधील कर्मचारी यांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. गटा-तटाचे राजकरण न करता पेशंटकडे लक्ष दिले पाहिजे.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, डॉक्टर व कर्मचा-यांनी तणावाखाली काम करु नये. महापौर यांनी वायसीएमला अचानक भेट दिली. त्यामुळे विविध अडचणी निदर्शनास आल्या. वायसीएममध्ये कर्मचारी संख्या कमी आहे. महापालिकेचा आकृतीबंध मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. मान्यता मिळाली की कर्मचारी भरती केली जाईल. पीजी डॉक्टारांना महापालिकेत समाविष्ट करणेबाबत कार्यवाही केली जाईल. पीजी डॉक्टर व मनपाचे डॉक्टर असे दोन गट करु नये. पेशंटला सेवा देणे हे आपले काम आहे. डॉक्टरांनी पेशंटला दुस-या हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला देऊ नये. वायसीएमची बदनामी होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. वायसीएमसाठी कोणत्याही फंडाची कमतरता पडणार नाही, असेही ते म्हणाले.
आयुक्त श्रावण हार्डीकर म्हणाले, पेशंटची समस्या व स्टाफची कमतरता याबाबत मंत्रालयातून महापालिकेचा आकृतीबंध आराखडा मंजूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळेल. त्यानंतर मंजूर पदे रोस्टर सिस्टीमद्वारे जाहिरात देऊन भरती केली जाईल. सध्या भरतीवर निर्बंध आहेत. विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता घेऊन कार्यवाही केली जाईल. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्युटद्वारे भरती चालू आहे. त्यामुळे लवकरच स्टाफ उपलब्ध होणार आहे. महत्वाच्या वॉर्डमध्ये परमनंट स्टाफ नेमण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने मनपाची सुरक्षा व्यवस्था वायसीएम इमारतीत लावण्याबाबत विचार केला जाईल. गेटवर खाजगी सुरक्षा लावली जाईल. डॉक्टरांनी जेनेरिक औषधांची शिफारस करावी. जी मशिनरी पडून आहेत त्याचा अँक्शन प्लॅन तयार करुन ती वापरात आणावीत. गरीब पेशंटला शासनाच्या महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे, सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी. वॉर्डमध्ये स्वच्छता ठेवण्यात येईल. त्यासाठी वॉर्डा-वॉर्डामध्ये स्पर्धा लावण्यात यावी. त्यामुळे वॉर्ड चांगले राहतील व शहराला चांगला आदर्श मिळेल.
————-