‘या’ परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी, कारण…
जगभरात कोरोना व्हायरसनं भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. चीनमधून सगळीकडे पसरत असलेला हा आजार भारतात आणखी पसरू नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे. जे परदेशी नागरिक १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आले, अशा नागरिकांना सध्या देशात येऊ द्यायचं नाही, असं फर्मान भारतात काढण्यात आलेलं आहे. चीनमधून हवाई, रस्ते किंवा समुद्री मार्गानं येण्याचे परदेशी किंवा चिनी नागरिकांचे सगळेच दारं सध्या बंद करण्यात आली आहेत. नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार अशा चारही देशांतून रस्त्याच्या मार्गानं येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
चीनचा पासपोर्ट असणाऱ्या सगळ्यांचा भारतीय व्हिसा सध्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांना कोणत्याच मार्गानं भारतात येता येणार नाही. ५ फेब्रुवारी २०२० पूर्वी काढलेला ई-व्हिसा असो वा नियमित व्हिसा असो कोणत्याही चिनी नागरिकाला सध्या भारतात प्रवेश मिळणार नाही, असे आदेश नागरी उड्डयन महासंचालकांनी काढले आहेत.जगात कोठेही राहणारे चीनचे नागरिक किंवा चीनमध्ये राहणारे परदेशी नागरिक आणि १५ जानेवारीनंतर चीनमध्ये जाऊन आलेले परदेशी पर्यटक यांना भारतात प्रवेश दिला जाणार नसल्याचे या आदेशात म्हटलेलं आहे.