मी शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही – राजनाथ सिंह
![I am a farmer's son, I can't take a decision against farmers - Rajnath Singh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/rajnath-sing.jpg)
नवी दिल्ली – देशात शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे राजकीय खडाजंगी जोरात सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच हे सरकार दोन तीन उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राहुल गांधींच्या या टीकेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही’, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले.
राजनाथ सिंह म्हणाले, ‘राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. राहुल गांधी माझ्यापेक्षा लहान आहेत आणि शेतीबद्दल मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या पंतप्रधानांनीही एका गरीब महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मला इतकंच सांगायचं आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही.’
त्याचबरोबर आंदोलन करणारे शेतकरी नक्षलवादी आणि खलिस्तानी असल्याच्या आरोपावर राजनाथ सिंह म्हणाले, ‘शेतकऱ्यांविरुद्ध कुणीही असे आरोप करायला नको. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनात असलेला आदर आम्ही व्यक्त करतो. आम्ही मान झूकवून शेतकऱ्यांना नमन करतो. ते आपले अन्नदाते आहेत.’