breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मी जेव्हा कधी मंदिरांमध्ये जातो, तेव्हा त्याचा त्रास भाजपला होतो-राहुल गांधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/modi-rahulji.jpg)
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यातच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. दरम्यान,आज राहुल यांनी भाजपवर तोफ डागली आहे. मी जेव्हा कधी मंदिरांमध्ये जातो, त्याचा सर्वाधिक त्रास भाजपला होतो. कारण मंदिरे त्यांच्या मालकीचे आहेत असे भाजपला वाटते, अशी घणाघाती टीका यावेळी त्यांनी केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुका घोषित झाल्यापासून राहुल यांनी कर्नाटकात अनेक दौरे केले आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक मंदिरे आणि मठांना भेटी देऊन दर्शन घेतले आहे. यावरून भाजपने अनेकदा त्यांच्यावर टीका केली आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी ते मंदिरे-मठांमध्ये जातात, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यावर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एक राजकीय नेता म्हणून श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणांना भेटी देतो ते समाजांमध्ये फूट पाडण्यासाठी नाही, असे उत्तरही त्यांनी विरोधकांना दिले.
कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धरामय्या सरकारविरोधात वातावरण असल्याचा दावा केला जात असला तरी तसं अजिबात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नरेंद्र मोदींकडून सिद्धरामय्या यांना लक्ष्य केलं जात आहे. यावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा तुरुंगात गेले आहेत, पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.