मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/rain-marathwada-farmer-abd_.jpg)
औरंगाबाद | महाईन्यूज
मराठवाड्यात रविवारी हिंगोलीचा काही भाग वगळता सर्वच जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रबीसह आंबा, द्राक्षे आदी फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि गंगाखेड शहरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत जिल्ह्णामध्ये कडक ऊन होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला, परभणी शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले, थंड वारे वाहू लागले, गंगाखेड शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला सायंकाळी ६़४५ च्या सुमारास पाथरी शहरातही विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे.
जालना जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे टेंभुर्णी, जाफराबाद, राजूरसह इतर भागातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रबी ज्वारी, गहू, हरभऱ्यासह फळबागांनाही या पावसामुळे फटका बसला. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले होते. रबी हंगामातही या बेमोसमी पावसामुळे नुकसान होत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी पहाटे अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांसोबतच आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास वाशी तालुक्यातील पारगावसह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. खरिपासोबतच रबीच्या पिकांनाही ‘अवकाळी’ने तडाखा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.