प्रवासी मजुरांसाठी जास्तीत-जास्त स्पेशल ट्रेन चालवा; राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून निर्देश जारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/train-dabe-ghasrale.jpg)
नवी दिल्ली | प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जास्तीत जास्त विशेष रेल्वे चालवाव्या अशा सूचना केंद्र सरकारकडून मंगळवारी जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यांनी महिला, लहान मुले आणि वृद्धांना प्राधान्य द्यावे असेही सांगण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये देशाच्या विविध कानाकोपऱ्यात अडकलेल्यांसाठी केंद्री गृह मंत्रालयाकडून राज्यांना एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल देण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या योजनेचा किंवा आदेशाच्या अंमलबजावणीचा सविस्तर तपशील दिला जातो.
कोरोना व्हायरसची आणि रोजगार जाण्याच्या भीतीमुळे अनेक जण आपल्या घरांच्या दिशेने निघाले आहेत. अशात अनेक कामगार दुसऱ्या राज्य आणि शहरांमध्ये भटकत आहेत. यांना आप-आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही दिशानिर्देश जारी केले जात आहेत अशी माहिती केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिली. भल्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, या मजुरांसाठी सर्व स्पेशल रेल्वे उपलब्ध करून देत असताना राज्य आणि रेल्वे विभागात समन्वय असावा. सोबतच, रेल्वे प्रवास करत असताना त्यांच्या वेटिंग रुम, सॅनिटायजेशन, खाद्य आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी सांगितले. एखादी रेल्वे, बस किंवा इतर प्रवासाचे वाहन नेमके किती वाजता निघणार आहे याची स्पष्ट माहिती जारी करावी. जेणेकरून प्रवाशांमध्ये संभ्रम किंवा अफवा निर्माण होणार नाही. राज्य सरकारांनी प्रवाशांपैकी महिला, चिमुकले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. पायी जाणाऱ्या प्रवासी मजुरांच्या राहण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकांवर त्या-त्या जिल्हा प्रशासनाकडून केली जाऊ शकते. जिल्हा प्रशासनाने एनजीओंच्या मदतीने प्रवाशांच्या मदतीसाठी सर्व माहिती पुरवण्याचे नियोजन करावे. यासोबतच, बसची संख्या वाढवता आली तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत.