पुस्तक वाचताना माणसे वाचायला शिका; अभिनेत्री मृणाल देव यांचे मत
![Learn to read people while reading a book; Opinion of actress Mrinal Dev](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-19T102659.098-780x470.jpg)
नागपूर : वाचनासाठी वेगवेगळी साधने निर्माण झाल्यामुळे वाचन संस्कृती कमी झाली नाही. त्यातही पुस्तके आजही वाचली जात आहे. मात्र, पुस्तक वाचताना माणसे सुद्धा वाचली पाहिजे. फक्त ती कुठली वाचायची हे प्रत्येक व्यक्तीने स्वत: ठरवले पाहिजे, असे मत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल देव यांनी व्यक्त केले.
रायसोनी आणि एजीआर नॉलेज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ऑरेंज सिटी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल कुळकर्णी व डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेते व लेखक डॉ. आकाश खुराणा यांच्या ‘मेन्टर मारफोसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. चिटणवीस सेंटरच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रायसोनी ग्रुपचे प्रमुख सुनील रायसोनी, शोभा रायसोनी, राजन वेळूकर आणि वर्षा मनोहर उपस्थित होते.
मृणाल देव म्हणाल्या, साहित्य हा माझा आवडता विषय आहे आणि त्या शिवाय माझा दिवस जात नाही. साहित्य माणसे घडविण्याचे काम करत असल्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांवर वाचन करताना समाजातील माणसेसुद्धा वाचली गेली पाहिजे. आजच्या इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती कमी झाली असल्याचे बोलले जात असले तरी मला मात्र पुस्तक वाचन कमी झाले आहे असे वाटत नाही. वाचनासाठी वेगवेगळी समाजमाध्यम निर्माण झाली असून वाचनाची भूक भागवत आहे. विशेष म्हणजे ती आज काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. निशिगंधा वाड म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रात किती पदवी मिळविल्या यापेक्षा आपण आयुष्यात किती माणसे वाचायला शिकलो हे महत्त्वाचे आहे. आपल्याला आपल्या मातृभाषेशी प्रेम असले पाहिजे. साहित्य हे अत्तरासारखे व्यापक असून ते समृद्ध कसे करता येईल त्या दृष्टीने अशा संमेलनातून प्रयत्न केले पाहिजे.
आकाश खुराणा म्हणाले, ७० वर्षांपूर्वी माझे आई-वडील नागपुरात आले. माझी जडणघडण नागपुरातच झाली. तेव्हाच्या माझ्या काही मित्रांची आठवण आजही ताजी आहे आणि ते खऱ्या अर्थाने माझे ‘मेण्टॉर’ होते. एका अर्थाने प्रत्येकाने आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अशा ‘मेण्टॉर्स’ची जपवणूक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सुनील रायसोनी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रास्ताविक राजन वेळूकर यांनी तर संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.