…नाहीतर सभागृहातच राजीनामा दिला असता, उदयनराजेंची प्रतिक्रिया
!["Lockdown rules should be reconsidered otherwise…," Udayan Raje warns Thackeray government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/UdayanRaje.jpg)
सातारा | राज्यसभेत शपथविधीच्या वेळेस वंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराज अशी घोषणाबाजी केल्याने फटकारले. मात्र, यावर उदयनराजे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही, असं सांगतानाच महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच खासदारकीचा राजीनामा दिला असता, असं भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका, जे घडलं नाही, त्याचा बाऊ करू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं.
राज्यसभेत काल उदयनराजे भोसले यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्याला आक्षेप घेत उदयनराजेंना समज दिली. त्यावरून राजकारण रंगल्याने उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकारण करणाऱ्यांना फटकारले. मी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्याने आक्षेप घेतला. त्यावर अध्यक्षांनी हे कुणाचं घर नाही. हे चेम्बर असून त्याचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं रेकॉर्डवर येणार नाही. यापुढे या गोष्टींचं भान ठेवा, असं नायडू यांनी सांगितलं.
त्यांनी जे सांगितलं ते राज्य घटनेला धरून होतं. राज्यघटनेनुसार त्यांना कामकाज करावं लागतं म्हणून त्यांनी त्यानुसार सांगितलं. त्यात काही चुकीचं नाही. त्यात अवमान होण्यासारखंही काही नाही. उलट त्यांनी मला नव्हे तर माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्याला रोखलं, असा दावा करतानाच मात्र, नॉन इश्यूचा इश्यू बनवून काही लोक राजकारण करत आहेत. विनाकारण वादाला जन्म देत आहेत, असं सांगतानाच महाराजाचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का? माझा स्वभाव पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी तिथेच राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो, असंही उदयनराजेंनी सांगितलं. नायडूंनी काही चुकीची भूमिका घेतली असती तर त्यांनी माफी मागावी म्हणून मीच मागणी केली असती. पण ते चुकलेत असं मला वाटत नाही, असंही ते म्हणाले.
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना त्यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते. तुम्ही त्यांना विचारू शकता असं काही घडलं का? तेही सांगतील. मी पवारांसोबत काम केलं आहे. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केलंय. कालही वेगळं काही घडलं असतं तर त्यांनी मला त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितली असती. पण काही घडलंच नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.