धक्कादायक! प्रेमविवाहाला कंटाळून कापले रेल्वेचे रुळ
उत्तरप्रदेश | महाईन्यूज |
ब्रेकअप झालं किंवा पत्नीशी भांडण झाल्याने वाद झाल्याच्या अनेक बातम्या वाचनात येतात. मात्र उत्तर प्रदेशमधील मऊ येथे एक विचित्र घटना समोर आलेली आहे. येथे प्रेमविवाहमुळे कंटाळलेल्या एका माथेफिरु तरुणाने चक्क रेल्वेचे रुळ कापले आहेत. मऊ जिल्ह्यातील रतनपुरा रेल्वे स्थानकाजवळ रुळ कापल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हलधरपूर रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या रतनपुरा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या खांबाजवळ एका माथेफिरुने रुळ कापल्याचे दिसून आले आहे. हे रुळ दोन इंचांपर्यंत कापण्यात आलेले होते. या कापलेल्या रुळांजवळ माथेफिरुने ठेवलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार प्रेमविवाहाला कंटाळून करत असल्याचं म्हटलेलं आहे. ‘आपण प्रेमविवाह करुन घरी आणलेल्या पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडावे. तसेच मला ५० कोटी रुपये द्यावेत,’ अशा विचित्र मागण्या या चिठ्ठीमध्ये माथेफिरुने केली आहे. इतकचं नाही तर ‘या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण यापेक्षा मोठा अपघात घडवून आणू’ असंही या माथेफिरुने चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे.