दोन कोटींपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज रद्द करु, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
![The Supreme Court is ready to hear the petitions of 10th and 12th class students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court-1.jpg)
नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे ज्यांचे कर्जाचे हप्ते थकले होते, त्यांच्यासाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधीतील (मार्च ते ऑगस्ट) व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन कोटींपर्यंतच्या कर्जाच्या व्याज रकमेवरील व्याज रद्द केलं जाऊ शकतं असं केंद्राने सांगितलं आहे. लघु, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांनी शैक्षणिक, गृहनिर्माण, ग्राहक वस्तू, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी कर्ज घेतलं होतं, त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाचं आर्थिक कंबरडं मोडलं होतं. त्यातच अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे अशा लोकांना दिलासा देण्याकरता केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. यावेळी केंद्राने परवानगीसाठी संसदेत प्रस्ताव मांडू अशी माहिती दिली. “सध्याच्या कोरोना संकटात व्याजाचं ओझं कमी करणं हा एकमेव मार्ग सरकारकडे आहे,” अशी माहिती केंद्राने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नव्हती का हे ग्राह्य न धरता सर्वांनाच चक्रवाढ व्याज माफ केलं जाणार आहे.
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने मोरॅटोरियम कालावधीतील व्याज रकमेवरील व्याज आकारण्याविरोधातील याचिकांवरील सुनावणी ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली होती. गेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील राजीव दत्ता यांनी केंद्र सरकार अद्याप कोणताही ठोस निर्णय घेऊ शकलं नसल्याचं सांगितलं होतं.
याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सुप्रीम कोर्टात करोना संकट लक्षात घेता कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून, बळजबरीने व्याज माफ करण्याचा निर्णय आपल्याला योग्य वाटत नाही, कारण यामुळे बँकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते असं सांगितलं होतं. याचा फटका बँकेच्या ग्राहकांनाचा बसेल असंही सांगण्यात आलं होतं.
दरम्यान ३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत केंद्राने मोरॅटोरियम कालावधीतील व्याज रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ न करण्याचा करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला असल्याचं सांगण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात केंद्राची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली होती. बँकिंग क्षेत्र हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अजून कमकुवत होईल असे निर्णय घेऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. व्याज रकमेवरील व्याज माफ न करण्याचा निर्णय घेताना पेमेंटचा भार कमी करण्याचं ठरवलं असल्याचं तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं.
करोना संकटामुळे रिझव्र्ह बँकेने २७ मार्चला कर्जदारांना आर्थिक ताणातून दिलासा म्हणून, मासिक हप्त्यांची परतफेड लांबणीवर टाकण्याची मुभा देणारा निर्णय घेतला. प्रारंभी तीन महिन्यांच्या मुदतीसाठी असलेला हा निर्णय आणखी तीन महिने म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० कालावधीपर्यंत वाढविण्यात आला होता. बँकांकडून मासिक हप्त्यांमधील मुद्दल अधिक व्याज यापैकी मुद्दल रकमेची वसुली लांबणीवर टाकली गेली असली तरी, न फेडलेल्या हप्त्यांमधील व्याजाची रक्कम थकीत मानून त्यावर थकलेल्या कालावधीत व्याज आकारले जाईल, अशा रीतीने ही योजना कर्जदार ग्राहकांपुढे ठेवली होती.