…देश सध्या खडतर अवस्थेत! सुधारित नागरिकत्व कायद्यावरील याचिकेवर सरन्यायाधीशांचे विश्लेषण
दिल्ली | महाईन्यूज
देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केलेलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सध्या देश कठीण परिस्थितीतून जात असून अशा याचिकांमुळे काही मदत होणार नाही असं सांगितलं आहे. याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास यावेळी नकार देण्यात आला आहे. हिंसाचार थांबत नाही तोपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही असं स्पष्टपणे यावेळी सांगण्यात आलेलं आहे.
वकील विनीत ढांडा यांनी सुधारित नागरिकत्व कायदा घटनात्मक असल्याचं जाहीर करावं तसंच याबाबत अफवा पसरवणारे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांवर कारवाई केली जावी अशी मागणी याचिकेतून केली होती. “संसदेकडून संमत करण्यात आलेल्या कायद्याला आम्ही घटनात्मक कसं काय जाहीर करु शकतो? न्यायालयाचं काम कायद्याची वैधता निश्चित करणे आहे. घटनात्मकता जाहीर करणं नाही,” असं यावेळी खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
“सध्या देश कठीण काळातून जात आहे. सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा याचिकांनी काही मदत होत नाही,” असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी यावेळी देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलानाचा उल्लेख करताना सांगितलेलं आहे. देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे असंही ते म्हणालेले आहे.