जालन्यातील नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार : गृहमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Jalna-Murder.jpg)
जालना : जालना जिल्ह्यातील मंठा इथल्या नवविवाहितेच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिली. या संबंधात अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे.
वैष्णवी गोरे नावाच्या नवविवाहितेची 30 जून रोजी हत्या झाली होती. वैष्णवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीने भर बाजारात चाकूने गळा कापून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कालच (3 जुलै) पीडित कुटुंबाची भेट घेऊन “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी केली होती. त्यानंतर “संबंधित घटना निंदनीय आहे. ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवली जाईल आणि गोरे कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल,” असं ट्वीट गृहमंत्र्यांनी केलं.