‘… जर अमित शहांनी मनात आणलं तर सीमावाद सहज मिटेल’
![BJP should stop giving dates: MP Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Sanjay-raut-1.jpg)
बेळगाव सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमध्ये सुरु असलेल्या वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० चा उल्लेख करत सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे राऊत यांनी म्हटले आहे. जर अमित शहांनी मनात आणलं तर बेळगाव सीमावादचा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, बेळगावमध्ये संजय राऊत म्हणाले, जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कलम ३७० हटवून काश्मीरचा मुद्दा निकाली काढू शकतात तर ते बेळगाव सीमाप्रश्नावरुन सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक वादही मिटवू शकतात. शक्तीशाली गृहमंत्रीच या मुद्यावर तोडगा काढू शकतात. अमित शहांमध्ये ती धमक आहे. पण त्यांनी हा मुद्दा मनावर घ्यायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.