गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गेंसह ज्येष्ठ नेत्यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Sonia-Rahul12.jpg)
नवी दिल्ली | काॅंग्रेसमध्ये सुरू असलेले संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेतृत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षातील २३ जेष्ठ नेत्यांनी पत्र लिहिले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद मल्लिकार्जुन खरगे यांसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून शुक्रवारी हकालपट्टी करण्यात आली. “भाजपचा मुकाबला करायचा असेल तर काँग्रेसला उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये समग्र बदल व्हायला हवा. खालच्या स्तरापासून वरपर्यंत नेतृत्वातबदल करण्यात यावा“, अशी मागणी करणारे पत्र गुलाम नबीआझाद, अंबिका सोनी, कपिल सिब्बल आदी २३ नेत्यांनी लिहिले होते. या पत्रावरून काँग्रेसमध्ये बराच वाद झाला होता.
अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती, तर राहुल गांधी पक्षाच्या बैठकीत या नेत्यांवर गंभीर आरोप केल्याचे बोलले गेले. तेव्हापासून पक्षात खदखद होती. शुक्रवारी (११ सप्टेंबर) रात्री पक्षात महासचिव आणि प्रभारींमध्ये बदल करण्यात आले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हे बदल जाहीर केले. उपरोक्तचार नेत्यांना सरचिटणीसपदावरून हटवताना पी. चिदंबरम, रणदीप सूरजेवाला, तारिक अन्वर आणि जितेंद्र सिंह यांना काँग्रेसकार्यकारिणीचे नियमित सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, आझाद यांचे नियमित सदस्यत्व मात्र कायम ठेवण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी एच.के. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी खरगे हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. खरगे यांची यापदावरून हकालपट्टी करण्यात आली.